पालिकेच्या गाळ्यावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये वाद
- इस्लामपूरमध्ये न्यायालयात प्रकरण
सांगली |
इस्लामपूर नगरपालिकेच्या गाळा वापरावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये वाद निर्माण झाला असून या प्रकरणी तीन महिन्यात चौकशी करून वैधता तपासण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनी बेकायदेशीर प्रक्रिया राबवून हा गाळा भाजप कार्यालयासाठी घेतला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे, तर हा गाळा देत असताना रितसर भाडेकरार केला असल्याचा प्रतिवाद भाजपकडून केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विश्वानाथ डांगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले, नगराध्यक्षांनी आपल्या संबंधित व्यक्तीच्या नावे नगरपालिकेचा गाळा घेऊन त्यामध्ये भाजपा पक्ष कार्यालय थाटले होते. याविरोधात आम्ही बैठकीमध्ये आवाज उठविला. त्यास दाद दिली नसल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अपक्ष आघाडीच्या वतीने उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील व तेरा सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी तीन महिन्यात चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे निर्देश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. लिलाव प्रक्रिया संगनमताने राबविण्यात आली असल्याचा आरोप डांगे व शहाजी पाटील यांनी केला.
दरम्यान, हा गाळा रितसर लिलाव प्रक्रिया राबवूनच देण्यात आला होता. भाडेकरारावर तत्कालिन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून यामागे केवळ नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष अशोकराव खोत यांनी केला आहे. नाममात्र भाड्यामध्ये पालिकेचे भूखंड हडप करण्याचा काहींचा डाव हाणून पाडल्याने असे आरोप करण्यात येत असल्याचे खोत म्हणाले.