“देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का?”
मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा ओलांडण्यासाठी आवश्यक असणारा ई-पास काढला होता का?, असा सवाल कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपरगावचा अचानक दौरा केला होता. या दौऱ्याच्या अनुषंगाने काळे यांनी माहितीच्या अधिकारात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज केला आहे. फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार अर्ज केला आहे का? याची माहिती काळेंनी मागवली आहे.
फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी पक्ष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम कोविड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. तेथे करोनाचे रुग्ण दाखल आहेत. अशा ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम घेतले तर साथ कशी अटोक्यात येणार. यापूर्वीही आम्ही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी वेळोवेळी केल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असं संजय काळेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भेट दिली. यावेळी करोनासंबंधीच्या नियमांचा भंग झाल्याची तक्रार काळे यांनी केली आहे. दहा पेक्षा जास्त लोकांची गर्दी करण्यास मनाई आहे, असं असताना फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक एकत्र येण्यास परवानगी दिली होती का? यासंबंधी पोलीस, तालुका किंवा जिल्हा प्रशासनाने कारवाई केली असल्यास त्याचा तपशील मिळावा, अशी माहिती काळे यांनी मागविली आहे.