“आमच्या प्रश्नांचं मुख्यमंत्र्यांकडे उत्तरच नव्हतं, म्हणून…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
विधानसभेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. यामध्ये मुंबईत महानगर पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप देखील फडणवीसांनी केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांविषयी भाजपावर टीकास्त्र सोडलं. यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. शिर्डीत बोलताना फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडलं आहे.
“मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिलीच पाहिजेत”
विधानसभेत आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिलीच पाहिजेत, असं यावेळी फडणवीस म्हणाले. “आम्ही इतकी भ्रष्टाचाराची प्रकरणं पुराव्यानिशी मांडली. मुंबई महानगर पालिकेत कोविडच्या काळात कशी लूट झाली, याची उदाहरणं दिली. त्याची कुठलीच उत्तरं सत्ताधाऱ्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी भावनिक भाषण केलं. ही त्यांची जबाबदारी आहे की या भ्रष्टाचाराचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, कुटुंबीयांवर सुरू असलेल्या कारवाईवरून उद्धव ठाकरेंनी विधानसभेत बोलताना टीका केली होती. त्याला फडणीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हाला कुणाच्याही कुटुंबापर्यंत जायचं नाहीये. कोणतीही एजन्सी कोण कुणाचं नातेवाईक आहे हे बघून कारवाई करत नसते. तथ्यांच्या आधारावर कारवाई होत असते”, असं फडणवीस म्हणाले.
न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचं विधान संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावरून देखील फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधला. “सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमर्तींनी महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली. त्यांची मतं कचऱ्याच्या डब्यात टाकतो असं म्हटलंय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सामनाची मतं कचऱ्याच्या डब्यात टाकली आहेत. अशी मतं व्यक्त करून आपल्या लोकशाहीवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे. आपल्या बाजूने निर्णय आला तर उत्तम आणि विरोधात निर्णय गेला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही ही लोकशाहीविरोधी नीती आहे”, अशा शब्दांत फडणवीसांनी टीका केली आहे.