ऑक्सीजन बेड न मिळाल्यामुळे उपसंपादक श्रीकृष्ण पादीर यांच्या पत्नीचे निधन
पिंपरी । प्रतिनिधी
दैनिक ‘प्रभात’मधील पुणे ग्रामीण विभागाचे वरिष्ठ उपसंपादक श्रीकृष्ण पादीर यांच्या पत्नी भारती (वय ३६) यांचे शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड येथे कोरोनामुळे निधन झाले.
याबाबत जेष्ठ पत्रकार संतोष वळसे पाटील यांनी माहीती दिली, ते म्हणाले की, शुक्रवारी पहाटे सव्वा दोन वाजता मला पादीर यांचा फोन आला. मी तुमची झोप मोड करत आहे. पत्नी भारतीला करोना झाला असून, एचआरसिटी स्कोर २४ आहे. त्यामुळे तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असून ऑक्सिजन बेड आवश्यक असल्याचे सांगितले. मी त्यांना इंद्रायणीनगर येथील डॉक्टर शेटे यांचा नंबर देऊन माजी आमदार विलास लांडे यांचा संदर्भ देण्यासाठी सांगितले.
तेथेही ऑक्सीजन बेडची व्यवस्था न झाल्याने त्यांनी माजी आमदार विलास लांडे यांना पहाटे फोन करून ऑक्सिजन बेडची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार माजी आमदार विलास लांडे यांनी खूप प्रयत्न केले. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हता.
भारती यांची तब्येत खालावत चालली होती. ऑक्सिजन बेडची नितांत आवश्यकता होती. यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना फोन करा, असे पादीर यांनी सांगितले. वळसे-पाटील यांचे स्वीय्य सहायक नवनाथ जरे यांना फोन करून वैद्यकीय मदतीची विनंती केली. माजी आमदार विलास लांडे यांच्याशी पुन्हा बोलून यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये भारती यांना बेड उपलब्ध करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांच्याशी पाठपुरावा करून बेड उपलब्ध केला. त्यानंतर सकाळीच यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये भारती यांना दाखल करण्यात आले.
उशीरापर्यंत बेड मिळत नव्हता…
संतोष वळसे-पाटील यांनी म्हटले आहे की, एका रुग्णाचे निधन झाले आहे, तो बेड खाली झाला तर तातडीने देण्याची व्यवस्था करतो, असे हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांनी मला सांगितले. सकाळी आठ वाजता संबंधित रुग्णाचे निधन झाले होते. भारती यांची तब्येत खालावत चालली होती. ऑक्सिजन लेवल ६० वर आली होती. आयसीयू रूममधील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेऊन बाहेर काढला. त्यानंतर सॅनिटायझरने रूम शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर भारती यांना आयसीयू कक्षात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांची शारीरिक हालचाल मंदावली. ऑक्सिजन लेवल कमी झाली आणि त्यांचे निधन झाले. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफने शर्तीचे प्रयत्न केले. परंतु, भारती यांनी कोरोनाशी झुंज हारली.