लोहमार्गालगतची झोपडपट्टी उध्वस्त; नागरिकांचा ‘बिऱ्हाड’ मोर्चा
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड लोहमार्गालगतची 40 वर्षांपूर्वीची झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाने उध्वस्त केली असून त्याविरोधात झोपडपट्टी सुरक्षा दलाने काल (सोमवारी) पिंपरी चौकापर्यंत ‘बि-हाड’ मोर्चा काढला. केंद्र, राज्य शासनाने झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
भाटनगर येथून पिंपरी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. भगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात हरिभाऊ वाघमारे, चंद्रकांत कांबळे, वैशाली अवघडे, प्रमिला ठोंबरे, सुभाष गलांडे, विलास थोरात, अजय ढकोलीया, अजित वाल्मिकी, सुखदेव मोरे, राहुल नाशे, लखन म्हेत्रे आदी सहभागी झाले होते. पिंपरी, चिंचवडच्या रेल्वे पटरी लगत झोपडपट्टी होती. ही झोपडपट्टी 40 वर्षांपूर्वी वसली होती. रेल्वे प्रशासनाने ही झोपडपट्टी अचानक उद्धवस्त करुन नागरिकांवर अन्याय केला आहे. या झोपडपट्टीतील नागरिकांचे केंद्र, राज्य सरकारने पुनर्वसन करावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
”पर्यायी भूखंड देऊन, घरे द्या”, ”हमारी झोपडपट्टी, हमारी ताकद”, ”झोपडपट्टी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची”, ”झोपडपट्टीच्या न्याय मागण्यांसाठी बि-हाड’ मोर्चा”, ”हल्लाबोल हल्लाबोल झोपडपट्टी उध्वस्त करणाऱ्या प्रशासनावर हल्लाबोल”, ”शासकीय योजनेनुसार पुनर्वसन झालेच पाहिजे” अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या.