पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशित झालेल्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
अमृतसर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्वनाथ धाम कॉरिडोरच्या उद्घाटनावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेवर बंदी घालण्याची मागणी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने केली आहे.” श्री काशी विश्वनाथ धाम का गौरवशाली इतिहास’ असे या पुस्तकाचे नाव असून त्यात चुकीचा इतिहास मांडल्याचा आरोप या समितीने केला आहे.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे माध्यम सचिव कुलविंदर रामदास यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या पुस्तकाचे ” प्रसाद ‘ म्हणून मोठ्या प्रमाणात वाटप करण्याचे काम उत्तर प्रदेश सरकारने केले आहे. मात्र या पुस्तकात शीख समाजाच्या श्रद्धास्थानांबाबत चुकीचा इतिहास मांडला आहे. त्याचा काशीशी संबंध जोडून चूक केली आहे. खालसा पंथाची स्थापना अन्याय आणि अत्याचारापासून धार्मिक मूल्ये आणि मानवी हक्काच्या संरक्षणासाठी झाली आहे. मात्र यात म्हटले आहे की, दहावे गुरू गुरू गोविंदसिंह यांनी खालसा पंथ स्थापन केल्यानंतर पंच प्यारेना प्रथम काशीला पाठवले होते.त्यामुळे त्यांना सनातन धर्माची सखोल माहिती मिळाली आणि ते त्यांच्या संरक्षणासाठी तयार झाले.शीख धर्माची स्थापना सनातन धर्माचे मुघलांपासून संरक्षण करण्यासाठी झाली आहे.मात्र हे सत्य लपविण्यासारखे आणि शीख धर्माबाबत अज्ञान असल्यासारखे आहे.
काशीला पाठवलेले संत हे खालसा स्थापनेवेळी आनंदपूर येथे आपले मस्तक अर्पण करणाऱ्या प्यारेपेक्षा वेगळे होते असे कुलविंदर सिंह रामदास यांनी म्हटले आहे.