देशातील कोरोना रुग्णाच्या संख्येत घट; पॉझिटिव्हीटी रेटही कमी
देश कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली असल्याने, केंद्र सरकार आणि राज्य सरकार उपाय योजना करण्याची तयारी करत आहे. त्यातच आता कोरोना आकडेवारीत घट झाल्याने दिसादायक चित्र निर्माण झाले आहे. आज समोर आलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत ३०,७७३ नवे रुग्ण समोर आले आहेत. १८ सप्टेंबर रोजी समोर आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत तेरा टक्के कमी आहे.
देशात गेल्या २४ तासात ३०,७७३ रुग्ण सापडले असून, ३८,९४५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कमी झाला असून, काल ३०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाचे ३,३२,१५८ रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, शनिवारी कोरोनासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह निती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्हीके पॉल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी आणखी एक संकट आ वासून उभा राहिले आहे. सेरोटाइप २ डेंग्युने देशातील ११ राज्यात थैमान घातलं आहे. सेरोटाइप 2 डेंग्युचे रुग्ण हे आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडु आणि तेलंगनामध्ये आढळले आहेत. या राज्यांना केंद्राने यासंदर्भात अॅडव्हायजरी ऑगस्टमध्ये आणि १० सप्टेंबरला जारी केली होती. आता पुन्हा एकदा राज्यांना याबाबत अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.