#AmphanCycloneअम्फान चक्रीवादळाच्या रौद्ररुपाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या ४१ तुकड्या तैनात
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचा उपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्तकतेच्या इशारा देण्यात आला आहे. संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआर एफच्या ४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाचे रौद्ररुप यामुळे दिघा, सुंदरबन, हतीया, या भागांवर मोठा परिणाम जाणविण्याची अधिक शक्यता आहे. यावेळी, ताशी १५५ ते १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये, पश्चिम मिदनापूर, साऊथ आणि नॉर्थ २४ परगणा, हावडा, हुगळी आणि कोलकाता या जिल्ह्यांमध्ये, तर ओदिशात, जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, जजपूर आणि बालासोर या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान होण्याचा इशारा, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी सर्तकता घेण्यात येत आहे. अम्फान या वादळाच्या रौदरुपाला तोंड देण्यासाठी एनडीआर एफच्या ४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काल केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते.
तसेच अम्फान या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आसाम आणि सिक्कीमच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडेल असा इशाराही भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी, एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ४१ तुकड्या, पश्चिम बंगाल आणि ओडिशात तैनात केल्या आहेत अशी माहिती, एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली आहे.