ताज्या घडामोडी

बारामतीच्या इशाऱ्यावर चालते ठाकरे सरकार, सदाभाऊ खोत यांची टीका

 नाशिक | करोनाच्या नियोजनासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार तोंडघशी पडले आहे. ठाकरे सरकार सध्या बारामतीच्या इशाऱ्यावर चालते आहे. मंत्री स्वत:ची दुष्कृत्ये आणि भ्रष्टाचार लपविण्यासाठी विविध मुद्द्यांना हवा देऊन मूळ प्रश्नांपासून पळ काढत आहेत. राज्यात शरद पवार यांनीच जातीयवाद पसरवून सहकार चळवळीचे वाटोळे केले, अशा परखड शब्दांत शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी महाआघाडी सरकारवर टीका केली.

‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत खोत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, करोना काळातही महाविकास आघाडी सरकार नियोजनात पूर्णत: अपयशी ठरले. कांदा, ऊसाला भाव देणे असो किंवा कृषीमालाची निर्यात धोरणे, फसलेल्या बियाण्यांचे प्रश्न असो, कुठलाही प्रश्न सरकारला सोडविता आला नाही. स्वत:चे अपयश लपविताना राज्यातील मंत्र्यांनी कायम केंद्राकडे बोट दाखविले आहे. राज्यात एमपीएससी, टीईटी, म्हाडा परीक्षा, पोलिस भरती आदी परीक्षांचे घोटाळे, पीकविम्याचे थकलेले पैसे, सोयाबीन न उगविल्याने रखडलेली कारवाई, नियमित कर्ज भरणाऱ्यांचा ५० हजारांच्या माफीचा प्रश्न, शेतीचे वीज कनेक्शन तोडणे किंवा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन अशा कुठल्याही प्रश्नावर सरकार तोडगा काढू शकले नसल्याचे ते म्हणाले.

मराठा आरक्षण बारामतीनेच घालविले

मराठा समाजाचे आरक्षण घालविण्यासाठी केवळ बारामतीचे पवार आणि पवार कंपनीच कारणीभूत असल्याचाही आरोप खोत यांनी केला. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना जातीयवादी ठरविण्यासाठी राज्यात नियोजनबद्ध मोर्चे काढण्यात आले. फडणवीस आरक्षणाच्या बाजूने प्रयत्न करीत होते त्यांनाच घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्येक समाजातून एक नेता हेरून त्याला राजकारणात लाभाचे वाटेकरी करण्याचे राजकारण बारामतीकरांनी खेळले. याचे पडसाद नाशिकच्या एनडीसीसीपर्यंत बघायला मिळतील. बँकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊनदेखील कुणावरही कारवाई नाही, या घटनांचे मथितार्थ समजायला हवेत. शरद पवारांपासून महाराष्ट्र वाचविण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल, अशी टीकाही त्यांनी केली.

गांजाचे बियाणे का दिले नाही?

नवाब मलिकांकडे सापडलेला गांजा हर्बल असल्याचे सांगण्यात आले. माझ्या कानावर ही गोष्ट आल्यानंतर मी स्वत: पवारांना पत्र लिहून असे हर्बल गांजाचे बियाणे शेतकरी हित लक्षात घेऊन मागितले. पण पवारांनी यावर अद्याप काहीच उत्तर का दिले नाही, असा उपरोधिक प्रश्नही खोत यांनी विचारला. ऊसाचे पीक घेणाऱ्यांना आळशी म्हणणाऱ्यांच्या पिढ्यांचा पिंड ऊस उत्पादकांवरच पोसला आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button