रामनवमी दिवशी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीतील १२५ जणांवर गुन्हा दाखल
धुळे |धुळे शहरातून रामनवमीच्या दिवशी भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ही रॅली पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता काढण्यात आली होती. तसेच या रॅलीदरम्यान धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्याच्या कारणावरून रॅलीत सहभागी झालेल्या तब्बल १२५ जणांवर धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळ्यात रामनवमीचा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडला. या रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त धुळे शहरातील प्राचीन राम मंदिराजवळ धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
राम नवमीच्या दिवशी धुळे शहरातील संतोषी माता चौकात काढण्यात आलेल्या भव्य रॅली दरम्यान काही तरुणांनी दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशा घोषणाबाजी केल्या होत्या. तसेच या रॅली संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्यामुळे धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली आहे.
काय म्हणाल्या होत्या साध्वी सरस्वती…
या कार्यक्रमादरम्यान, साध्वी सरस्वती यांनी धुळेकरांना संबोधित करत असताना वादग्रस्त विधान केलं आहे. काश्मीर फाईल या चित्रपटाच्या विषयाला अनुसरून ‘धुळ्यात देखील दुसऱ्या कश्मीर फाईल ची पुनरावृत्ती ना होवो यासाठी एक लाख रुपयाचा मोबाईल, लॅपटॉप हातात बाळगणाऱ्या हिंदू तरूणांनी एक हजार रुपयाची तलवार देखील हातात ठेवावी. अश्र-शस्त्र ठेवणे तर आपल्या हिंदूंची शान आहे’, असं म्हणत साध्वी सरस्वती यांनी हिंदु तरुणांना तलवार हातात बाळगण्याचे खुले आवाहन या कार्यक्रमादरम्यान केले. साध्वी सरस्वती यांच्या या वादग्रस्त विधानाचे कशा पद्धतीने पडसाद धुळे जिल्ह्यात उमटतात हे बघणं देखील तिथकचं महत्वाच ठरणार आहे.