#Covid-19: कोरोनाची लस घेण्यासाठी पहाटेपासून रांगाच-रांगा
- पाच दिवसांनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू; अनेक केंद्रांवर अनियंत्रित गर्दी
मुंबई |
पाच दिवसानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीचे लसीकरण सुरू झाल्यामुळे मुंबईतील अनेक केंद्रांवर बुधवारी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केल्यामुळे अनेक केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. अनेक केंद्रांवर नागरिकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. महापालिकेने सरकारच्या सूचनेनुसार खासगी केंद्रांवरील लसीकरण बंद केल्यामुळे वेळ घेऊन आलेल्यांनाही रांगेतच ताटकळत राहावे लागत असून ज्येष्ठ नागरिकांसह अपंग व्यक्तींचे हाल होत आहेत.
लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने अद्यापही मुंबईतील लसीकरण मोहीम सुरळीत सुरू झालेली नाही. ४५ वर्षांवरील नागरिकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरणही पूर्ण झालेले नाही. त्यातच रोज दुसरी मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे. अनेक केंद्रावर सकाळपासून लागणाऱ्या रांगांनी केंद्रावरील कर्मचारी आणि व्यवस्थापन हवालदिल झाले आहे. खासगी लसीकरण केंद्रेही बंद केल्यानेही नागरिकांना पालिकेच्या केंद्रांशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यात वेळ घेतली तरी रांगेतच ताटकळत राहावे लागत असल्याने आता लस मिळविण्यासाठी ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील सर्वानाच गर्दीमध्ये राहूनच धडपड करावी लागत आहे. वेळ घेतली असली तरी टोकन घेऊनच लसीकरण केले जाईल, असा नियम पालिकेच्या काही लसीकरण केंद्रांनी लागू केला आहे. त्यामुळे नोंदणी केलेले, वेळ घेतलेले आणि नोंदणी न के लेले अशा सर्वानाच केंद्रावर पहाटे चार वाजल्यापासून तर काही केंद्रावर सकाळी सहा वाजल्यापासूनच रांगा लावाव्या लागत आहेत.
वाचा- #Covid-19: आंतरराज्य प्रवासासाठी करोना चाचणीचे बंधन नको- ICMR