#Covid-19: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी! पार केला लसीकरणाचा मोठा टप्पा
पुणे |
गेल्या साधारण दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी सध्या लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहेत. भारतातही या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. तर महाराष्ट्राने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे. महाराष्ट्राने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. काल म्हणजे १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. मुंबईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८३ लाख ८५ हजार १०६ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला तर त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागतो. ६९ लाख ९० हजार ९४९ पुणेकरांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
महाराष्ट्राने आज ५ कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.
Maharashtra crosses the mark of administering 5 crore vaccination doses.#BreakTheChain
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 17, 2021
तर देशानेही लसीकरणाच्या बाबतीत मोठा टप्पा गाठला असून देशभरात नागरिकांना देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या सोमवारी ५५ कोटींपलीकडे गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
‘लसीकरणाच्या बाबतीत भारताने विक्रमी प्रगती केली असून आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ५५ कोटी मात्रा दिल्या आहेत. करोना विरोधातील भारताचा लढा बळकट करा. लसीकरण करून घ्या!’, असे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी केले.