#Covid-19: आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील, DGCAचा निर्णय
नवी दिल्ली |
देशात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशभरात गेल्या २४ तासांत २,८२,९७० नवीन करोनाबाधितांसह ४४१ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. देशात सध्या १८ लाख ३१ हजार सक्रीय रुग्ण असून डेली पॉझिटिव्हीटी रेट १५.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ नोंदवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ओमायक्रॉनचे ८ हजार ९६१ रुग्ण आढळले आहेत. याच दरम्यान, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील, नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी बुधवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणांना लागू होत नाहीत, ज्यांना DGCA ने मंजूरी दिली आहे आणि ज्या देशांसोबत भारताने एअर बबल व्यवस्था केली आहे अशा देशांतील उड्डाणे, सुरू राहतील. यापूर्वी, डीजीसीएने १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मागे घेत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंदी वाढवली होती.
"The authority has decided to extend the suspension of Scheduled International commercial passenger services to/from India till 2359 hrs IST of 28th February 2022," reads an official letter of Civil Aviation pic.twitter.com/QctWuxtmvs
— ANI (@ANI) January 19, 2022
- राज्यातील बाधितांच्या संख्येत घट- आरोग्यमंत्री टोपे
राज्यातल्या दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आता कमी होत चालल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. एएनआयशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातल्या दैनंदिन करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे आणि राज्यातली एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे. फारच कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत आहे. चाचण्यांच्या संख्येत वाढ करणं आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं यासाठी शासन पूर्ण क्षमतेनं काम करत आहे.