#Covid-19: मीरा-भाईंदरमध्ये लसीकरण केंद्रांवर गर्दी
- लस मिळण्याच्या आशेने शहराबाहेरील नागरिकांचीही हजेरी; संसर्ग वाढण्याचा धोका
भाईंदर |
मीरा-भाईंदर शहरातील लसीकरण केंद्रावर लस मिळेल या आशेने स्थानिक नागरिकांची गर्दी होत असतानाच आता इतर शहरांतील नागरिकदेखील हजेरी लावत असल्याचे समोर आले आहे. मात्र शहराबाहेरील नागरिकांना लस देण्यात येत नसली तरी होणाऱ्या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे. शहरात लशीचा तुटवडा सातत्याने भासत असल्याने दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांना अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. बुधवारी महानगरपालिकेला १० हजार लशींचा साठा उपलब्ध झाल्यामुळे एकूण १२ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात प्रति दिवस सुमारे दोन हजार नागरिकांचे लसीकरण प्रति दिवस पार पडत आहे. मात्र करोनाविषयी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असल्याने मोठय़ा संख्येने नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीत अनेक नागरिक हे शहराबाहेरील असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार ऑनलाइन नोंदणी केल्यास कोणत्याही केंद्रावर लसीकरण करण्यात येते. मात्र मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांकरिता लशीचा तुटवडा भासत असल्याने ऑनलाइन स्वरूपात केवळ पाच टक्केच नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे, तर दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांना लस देण्याचे काम सध्या सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र इतर शहरांतील नागरिक ऑनलाइन नोंदणी न करता केवळ लस मिळेल या आशेने लसीकरण केंद्रावर हजेरी लावत असल्याने करोनाचा संसर्ग अधिक झपाटय़ाने पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांना प्रथम लस देण्याचे काम करण्यात येत आहे. लशीच्या तुटवडय़ामुळे शहरातील स्थानिक नागरिकांना लस दिली जात आहे. त्यामुळे शहराबाहेरील नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये, अशी आम्ही जनजागृती सातत्याने करत आहोत.
– डॉ. अंजली पाटील,लसीकरण प्रमुख