COVID 19 : दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही परिस्थिती चिंताजनक
मुंबई – दिवाळीनंतर दिल्लीमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे.
मुंबईसह उपनगरात तब्बल पाच महिन्यानंतर कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबईसाठी पुढील 4 आठवडे महत्त्वाचे असून सर्वसामान्यासाठी लोकल सेवा तुर्तास सुरू करता येणार नाही, असा मोठा खुलासा बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केला आहे.
आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईत वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. मुंबईसाठी पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असंही आयुक्त चहल यांनी स्पष्ट केलं.
या 4 राज्यात स्थिती पुन्हा गंभीर
दिवाळीनंतर महाराष्ट्रासह दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा स्फोटक झाली आहे. 15 ते 19 नोव्हेंबरपर्यंत देशात एकूण 2.22 लाख नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 52 टक्के याच 4 राज्यांतील आहेत. देशात गेल्या 5 दिवसांत 2,903 मृत्यू झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे या चारही राज्यांत नव्या रुग्णांत सातत्याने वाढ होत असून इतर मोठ्या शहरांत हा आकडा स्थिर वा त्यात किरकोळ वाढ होत आहे.
स्वीमिंग पूल, शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, ते लांबणीवर पडणार आहे. दरम्यान, मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत सरकारी, खासगी शाळा बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. एकाही मुलाला धोक्यात टाकायचं नाही म्हणून हा निर्णय घेतल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं.
संसर्गाकडे बघता गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, राजकोट व बडोद्यात शुक्रवारी रात्री 9 पासून सोमवारी पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. यानंतर रात्रीही कर्फ्यू असेल. मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, रतलाम व विदिशात रात्रीचाही कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. .