#CoronaVirus: 27 तारखेपासून प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये लॅब सुरु
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे. अशामध्ये तपासणी केंद्र वाढवण्याकडे सरकारचा जास्त भर असल्याचं पहायला मिळत आहे. मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात टेस्टिंग लॅब वाढवण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. २७ तारखेपासून प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये लॅब सुरु होईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
आरोग्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी १५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८९ वर पोहचली आहे. यामधील १४ रुग्ण मुंबईचे आणि १ रुग्ण पुण्याचा आहे. ८ जणांना संपर्कातून कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर इतर ६ कोरोनाबाधित रुग्ण हे परदेशातून आले आहेत. तसंच, ८९ रुग्णांपैकी मुंबईचा एक आणि पुण्याचा एक रुग्ण आयसीयूमध्ये असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं आहे…
दरम्यान, नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी घरातून बाहेर पडू नका. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा. घरी राहून आपण सुरक्षित अंतर ठेवा. अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.