#CoronaVirus: राहुल गांधींचे वक्तव्य योग्यच; नवाब मलिकांनी सांगितलं महाराष्ट्रात कुणाचं सरकार?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील करोना स्थिती विषयी बोलताना राज्यात काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आहे, पण मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. राहुल गांधी यांच्या विधानावरून आता चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी राहुल यांच्या भूमिकेचं समर्थन करत राज्यात कुणाचं सरकार? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना आणि स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर विविध राज्यांमधील परिस्थितीविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचा सरकारला पाठिंबा आहे, पण मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असं म्हटलं होतं. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.
भाजपाकडून झालेल्या टीकेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाला उत्तर दिलं आहे. “महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नाही, हे राहुल गांधी यांचं वक्तव्य खरं आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं. तिन्ही पक्षांचे स्थिर सरकार जनतेसाठी एकजुटीनं काम करतंय हे राहुलजींच्या वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं,” असं नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
महाराष्ट्रात @INCMaharashtra चे सरकार नाही हे श्री @RahulGandhi यांचे वक्तव्य खरे आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. तिन्ही पक्षांचे स्थिर सरकार जनतेसाठी एकजुटीने काम करतंय हे राहुलजींच्या वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 26, 2020
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येविषयी भूमिका मांडली होती. दाट वसाहत असलेल्या ठिकाणी करोनाचा प्रसार जास्त होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील रुग्ण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. पण मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. असं असलं तरी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी. आम्ही सरकारला सूचना करू शकतो. त्या स्वीकारायच्या की नाही हे सरकारवर अवलंबून आहे,” असं राहुल गांधी म्हणाले होते.