#CoronaVirus: भारतीय रेल्वेला याचा मोठा फटका,रेल्वेच्या उत्पन्नात 454 कोटी रुपयांची घट
कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा अनेक वाहतुकिंवर याचा परिणाम झालेला पहायला मिळतोय… भारतीय रेल्वेला याचा मोठा फटका बसला आहे. या विषाणूचे संक्रमण कमी करण्यासाठी नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेल्वेनेही आपल्या काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. याचा फटका रेल्वेच्या उत्प न्नाला बसला आहे. रेल्वेच्या उत्पन्नात 454 कोटी रुपयांची घट झाली आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी रेल्वेने गेल्या आठवड्यात 184 रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे या रेल्वेगाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर रेल्वेला पाणी सोडावे लागले. गेल्यावर्षाच्या तुलनेत रेल्वेच्या प्रवासी संख्येत गेल्या आठवड्यात 69 लाखांची घट झाली आहे. ही टक्केवारी 45 इतकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी घटल्यामुळे त्याचा फटका रेल्वेच्या उत्पन्नाला बसला आहे.
कोरोना विषाणूमुळे बुधवारी भारतीय रेल्वेकडून 99 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्वेगाड्यांमध्ये आवश्यक प्रवासीच नसल्यामुळेही गाड्या रद्द करण्यात येत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही ठिकाणी प्रवाशांकडूनच आपले आगाऊ आरक्षण रद्द करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेची आगाऊ आरक्षणे रद्द करण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत 80 टक्क्याने वाढले आहे, असे रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या गुरुवारी सकाळी 166 पर्यंत जाऊन पोहोचली आहे.