#CoronaVirus: तज्ज्ञांचे मते, तापमान वाढले तर कोरोनाचा प्रभाव घटेल
औरंगाबाद | महाईन्यूज
जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू २८ ते ३० डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. हा विषाणू कपड्यांवर ९ तास, तर लोखंडी पृष्ठभागावर १२ तास जगू शकतो. औरंगाबादेत उन्हाळ्यात एप्रिलमध्ये तापामानाचा पारा ४३ अंशांवर जातो. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेने कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
शहरात वातावरणातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकल्यासह नाक बंद होणे, डोकेदुखी, ऐकू न येणे, तसेच घसादुखीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. शहरात गतवर्षी एप्रिलमध्ये ६१ वर्षांनंतर उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात कोरोनाची भीती दूर होईल. आगामी काही दिवस ढगाळ वातावरण राहील. मात्र, उच्च तापमान, कोरडे वातावरण या विषाणूसाठी मारक ठरेल, असे तज्जांचे मत आहे.