#CoronaVirus: झोपडपट्टय़ांत एका रुग्णामागे दहा जणांचे अलगीकरण
मुंबई : शहरातील झोपडपट्टय़ा आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये करोनाचा प्रसार वेगाने होऊ लागल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अशा वस्त्यांतील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान दहा जणांना अलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
शहरात धारावी, माहीम, दादर, वरळी कोळीवाडा अशा दाटीवाटीने घरे असलेल्या भागांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये रुग्णाचे निदान झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घेतला जात होता. परंतु जसजशी रुग्णसंख्या वाढत गेली तसतशी संपर्क शोध मोहीम मागे पडत गेली. चाचणी, अलगीकरण याबाबत पालिकेच्या रोज बदलत्या नियमावलीमुळे यातील संभ्रम अधिकच वाढत गेला. परिणामी हे भाग अतिसंक्रमित क्षेत्र बनले आहेत.
एम पूर्व भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी रविवारी या परिसराची पाहणी केली. त्यादरम्यान करोनाबाधितांचा संपर्कशोध अपुरा पडत असल्याचे समोर आल्यानंतर आयुक्तांनी प्रत्येक रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान दहा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याचे आदेश सर्व विभागीय सहआयुक्तांना दिले आहेत. प्रत्येक विभागात, मोठय़ा मैदानांमध्ये अलगीकरण केंद्र उभारल्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे अलगीकरण करणे शक्य होईल, असे विभागीय सहआयुक्तांनी सांगितले.
रुग्णाच्या कुटुंबीयांचा अनुभव
‘माझ्या पतीचा मृत्यू करोनामुळे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात झाला. परंतु माझ्या घरी कोणीही विचारपूस करायला आले नाही. त्यामुळे भीतीने मीच माझ्या मुलीला घेऊन विभागातील आरोग्य केंद्रामध्ये गेले. परंतु लक्षणे नाहीत तर घरीच राहा असे सांगितल्याने आम्ही परतलो,’ असे धारावीतील एका ४५ वर्षीय महिलेने सांगितले.