#CoronaVirus: चिंता वाढली, गावी राहून परतलेल्या मुंबईकराला कोरोनाची लागण; २५ जण क्वारंटाइन
सांगलीमध्ये करोनाचा रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे. रेठरे धरण येथे हा रुग्ण सापडला आहे. गावी २० दिवस राहिल्यानंतर तो मुंबईत परतला होता. मुंबईत चाचणी केली असता त्याला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सांगलमधील २५ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मिरजमधील करोना रुग्णालयात या सगळ्यांना दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत जवळपास २० दिवस राहून मुंबईत परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. पण यामुळे करोनाचा यशस्वीपणे मुकाबला करणाऱ्या सांगली जिल्हा प्रशासनाचा चिंता पुन्हा वाढली आहे. दरम्यान पूर्वकाळजी म्हणून रेठरे धरण गाव सील करण्यात आलं आहे.
मुंबईत वास्तव्यास असणारी ही व्यक्ती २० मार्च रोजी रेठरे धरण येथे आली होती. ५ एप्रिल रोजी आजारी पडल्याने त्याला इस्लामपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार झाल्यानंतर तो पुन्हा मुंबईत परतला होता. १० एप्रिल रोजी तो मुंबईत आली होता. यावेळी मुंबईमधील रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली असता करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं.
सांगलीतील मिरज येथे अचानक २५ करोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी २४ रुग्णांची दुसरी चाचणी नेगेटिव आल्यानं मोठं यश मिळालं होतं. पण आता पुन्हा एकदा सांगली जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभं राहिलं आहे.