#CoronaVirus: केंद्राकडून होणार दीड लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा?; १० कोटी लोकांना मिळणार थेट लाभ
करोना विषाणूमुळे लॉकडाऊन झेलणाऱ्या देशाला संकटापासून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १.५ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, यावर अद्याप सरकारकडून अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेमध्ये चर्चा सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते.
केंद्र सरकारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आर्थिक मदत योजना २.३ लाख कोटींपर्यंतही असू शकते. मात्र, अंतिम आकड्याबाबत अद्यापही चर्चा सुरुच आहे. या आठवड्याच्या शेवटापर्यंत याची घोषणा होऊ शकते. याद्वारे १० कोटी लोकांच्या बँक खात्यात थेट रक्कम टाकली जाणार आहे. ही मदत गरीबांना आणि त्या लोकांना दिली जाणार आहे ज्यांच्यावर लॉकडाऊनमुळे सर्वाधिक परिणाम झाला आहे.
भारतात आजवर करोनाग्रस्तांची संख्या ६०६वर पोहोचली आहे. यांपैकी १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.