breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#Coronavirus: कोरोनाच्या धास्तीमुळे आखाती देशातून येणाऱ्यांच्या संख्येत वाढ
करोना विषाणूच्या धास्तीने आखाती देशात काम करणारे अनेक जण रायगड जिल्ह्य़ात दाखल झाले आहेत. या सर्वावर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख ठेवण्यात येत आहे. १४ दिवस घरातच थांबण्याचे निर्देश सर्वाना देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्य़ातील महाड, श्रीवर्धन, म्हसळा आणि माणगाव तालुक्यातील अनेक जण आखाती देशात कार्यरत आहेत. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यातील बरेचसे जण भारतात परतले आहेत. आता या सर्वावर लक्ष ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. गेल्या २३ दिवसांत रायगड जिल्ह्य़ात ९३५ जण परदेशातून दाखल झाले आहेत. यातील ६५१ जणांना त्यांच्याच घरात अलगीकरण करून ठेवण्यात आले आहे, तर ९५ जणांना शासकीय अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. यातील बहुतांश जण हे आखाती देशातून आलेले आहेत. १८७ जणांचा १४ दिवसांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे.