#CoronaVirus:एपीएमसी मार्केटमधील व्यापारी पिता-पुत्राचा कोरोनामुळे मृत्यू
नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबईतील या भाजीपाला मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरात कोरोनामुळे पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे . अवघ्या 6 दिवसात दोघांचाही कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे त्यापूर्वी 11 मे रोजी या व्यापाऱ्याच्या आजोबांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच महिन्यात घरातील 3 सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहेत.
एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना रुग्णाची संख्या 600 वर गेली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता भाजीपाला व कांदा बटाटा मार्केटमध्ये 2 दशकांपासून व्यवसाय करणाऱ्या या कटुंबातील तिघांच्या मृत्यू झाल्याने एपीएमसी मार्केटमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे.
एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये व्यवसाय करणारे हे तिघे पिता, पुत्र आणि नातू नेरुळ येथे राहत होते. 11 मे रोजी आजोबांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. यानंतर वडील आणि मुलगा दोघेही एपीएमसीमधील भाजीपाला व कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापार करत होते. या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. एकीकडे आजोबांचा मृत्यू झाला असतानाच घरातील दोन कर्ते पुरुष कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेत असल्याने कुटुंब तणावात होते. मात्र, उपचार सुरु असतानाच 23 मे रोजी 25 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या दुःखातून संपूर्ण कुटुंब सावरत नाही तोच 29 मे रोजी वडीलांचाही कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंबच कोलमडले आहे.
एकाच महिन्यात एकाच कुटुंबातील तीन कर्त्या पुरुषांचा असा दुर्देवी अंत झाल्यामुळे नवी मुंबईत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडल्यानंतर एपीएमसीचे पाचही मार्केट 7 दिवस बंद करण्यात आले होते. सर्वाधिक रुग्ण फळ, भाजीपाला आणि धान्य मार्केटमध्ये सापडले आहेत. आता कांदा बटाटा मार्केटमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आहे. त्याच बरोबर मार्केटमध्ये प्रवेशद्वारावर काम करणाऱ्या एपीएमसी कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मागील 2 महिन्यांपासून 10 वेळा अधिकाऱ्यांसोबत बैठका करण्यात आल्या. तसेच कोरोनाची प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनकडून लाखो रुपये खर्च करुन विविध उपायोजना करण्यात आल्या. मात्र या उपायोजना कुठे राबवण्यात आल्या असा प्रश्न आता व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.