कोरोनाचा धोका टळला! अनलॉकसाठी केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्याकरता केंद्र सराकरने अनलॉकसाठी नवे गाईडलाईन्स जारी केले आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारही सुरळीत केले जाऊ शकतील.
केंद्रीय गृहसचिव अजल भल्ला यांनी राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. सचिवांनी या पत्रात राज्यातील तसंच जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची संख्या पॉझीटिव्हिटी रेट या साऱ्याचा विचार करुन राज्यात सूचना जारी करण्यास सांगितल्या आहेत. गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या या सूचनांचा मूळ उद्देश हा देशातील विविध आर्थिक व्यवहार सुरळीत करणं हा आहे.
काय आहेत सूचना?
सामाजिक, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, उत्सव यासह विविध समारंभावरील निर्बंध हटवले जाऊ शकतात.
शाळा, महाविद्यालयं तसंच विविध कोचिंग क्लासेस अशा शैक्षणिक आस्थापना कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरु करता येतील.
रेस्टोरेंट, सिनेमा हॉल आणि व्यायाम शाळा इत्यादी आस्थापना सुरु करता येऊ शकतात.
लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले जाणार आहेत.
सार्वजनिक वाहतूकींवरील निर्बंध तसंच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवासासाठीचे निर्बंधही काढण्यात येणार आहेत.
सरकारी तसेच खाजगी कार्यालयं कोणत्याही निर्बंधांशिवाय सुरु करता येतील. असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.