देशभरात करोनाचा पुन्हा हाहाकार! २४ तासांत ४५९ जणांनी गमावले प्राण
नवी दिल्ली |
देशावरील करोना संकट अधिक गंभीर होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्णसंख्या वाढत असून, गुरुवारी समोर आलेल्या आकडेवारीने रुग्णवाढीचा विस्फोट झाल्याचं दिसून आलं. मागील २४ तासांत देशभरात ७२ हजार ३३० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात साडेचारशेपेक्षा जास्त नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच करोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.
महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाचा उद्रेक झाला असून, प्रचंड वेगाने लोकांना संसर्ग होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. मागील २४ तासांत देशात रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ७२ हजार ३३० नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४० हजार ३८२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. काळजीची बाब म्हणजे मृत्यूची संख्याही वाढली आहे. याच कालावधीत देशात ४५९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
India reports 72,330 new #COVID19 cases, 40,382 discharges, and 459 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,22,21,665
Total recoveries: 1,14,74,683
Active cases: 5,84,055
Death toll: 1,62,927Total vaccination: 6,51,17,896 pic.twitter.com/zoMlMyXlKj
— ANI (@ANI) April 1, 2021
करोनाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाला वेग दिला आहे. ज्या राज्यांमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे, तिथे लसीकरण वेगानं करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. देशात आतापर्यंत ६,५१,१७,८९६ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. दरम्यान, देशात सध्या पाच लाख ८४ हजार ५५ जण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६२ हजार ९२७ जणांचा मृत्यू झाला आहे.