वर्ध्यात कोरोना प्रतिबंध नियम आणखी कडक
वर्धा – वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतो आहे. अनेक प्रतिबंधात्मक नियम लागू केलेले असूनदेखील येथे संसर्गाला थोपवण्यात यश येत नाहीये. वाढता संसर्ग लक्षात घेता आता येथील जिल्हा प्रशासनाने नियमांत आणखी कठोरता आणली आहे. प्रशासनाने वर्धा जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांच्या वेळेमध्ये बदल केला असून उद्यापासून (17 एप्रिल) सकाळी 7 ते दुपारी 2 वाजतापर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे. तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.
वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. येथे उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजतापर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. यामध्ये वैद्यकीय सेवा, मेडिकल सेवा यांचा समावेश नसून या नियमित सुरू राहतील. खानावळ, हॉटेल, रेस्टॉरंट येथून पार्सल सेवा तसेच दूध केंद्र, दूध घरपोच वितरण सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. किराणा, भाजीपाला, फळ विक्री आदी सेवा सुरु ठेवण्याची वेळ कमी करण्यात आली असून यासेवा सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत.
गर्दी होत असल्यामुळे निर्णय
राज्य सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे अनेक सध्या अनेक निर्बंध लागू आहे. सर्वजिक ठिकाणी तसेच वेगवेगळ्या समारंभांना गर्दी होऊ नये हा या मागचा उद्देश आहे. मात्र संचारबंदी लागू असूनसुद्धा वर्धा जिल्ह्यात तसेच वर्धा शहरात लोकांची गर्दी कमी होत नव्हती. या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची शक्यता वाढत आहे. हा विचार करून येथील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नियम आणखी कठोर करुन अत्यावश्यक सेवेत बदल केले आहेत. या नव्या बदलांची नागरिकांनी नोंद घेऊन त्याचे तंतोतंत पलन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.