दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढली, आजपासून पुढील सोमवारपर्यंत कडक लॉकडाऊन; केजरीवालांची घोषणा
नवी दिल्ली – महाराष्ट्राप्रमाणेच राजधानी दिल्लीही कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे साहजिकच दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण येत आहे. काल दिवसभरात दिल्लीत २५ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिल्लीत सध्या कोरोनाची चौथी लाट आली असून ही लाट अत्यंत भीषण असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. त्यामुळे दिल्लीत सोमवारी रात्री (१९ एप्रिल) ते २६ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा करुन सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
अरविंद केजरीवाल जनतेला संबोधित करताना म्हणाले की, ‘आम्ही चाचण्या कमी केल्या नाहीत तर वाढवल्या. दिल्लीत रोज १ लाख चाचण्या होत आहे. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत कधीही खोटं बोललो नाही. जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली. दिवसाला २५ हजार रुग्ण मिळत असतील तर आरोग्य व्यवस्था ढासळेल. दिल्लीत १०० पेक्षा कमी आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. एका खासगी रुग्णालयाने तर रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपला होता असं सांगितलं. मात्र वेळीच उपलब्ध झाल्याने खूप मोठी दुर्घटना टळली. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीमध्ये परिस्थिती गंभीर आहे.”
पुढे ते म्हणाले की, ‘दिल्लीमध्ये आतापर्यंत आपण परिस्थिती चांगली हाताळली आहे. दिल्लीतील आरोग्य व्यवस्था सध्या सीमेवर आहे. कोणत्याही यंत्रणेच्या आपल्या मर्यादा आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.
“दिल्लीमध्ये आणखी रुग्णांना दाखल करून घेणं शक्य नाही आणि लॉकडाउनला पर्याय नाही असं लक्षात आलं आहे. आज रात्री दहा ते पुढील सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाउन राहणार आहे. यावेळी मेडिकल, खाण्यापिण्याची दुकानं सुरू राहतील. काय सुरू राहणार व काय बंद यासंबंधी सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.
दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करताना अत्यावश्यक सेवा सुरु राहतील अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसंच लग्नासाठी फक्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असून त्यासाठी पास दिले जातील असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सहा दिवसांचा लॉकडाउन आहे त्यामुळे कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका. आम्ही तुमची काळजी घेऊ असं आश्वासन दिलं. तसंच हा लॉकाडउन वाढवण्याची गरज भासू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली.
“माझ्यावर विश्वास ठेवा हा लॉकडाउन नाइलाजानं करावा लागत आहे. कुणीही दिल्ली सोडू नका, विश्वास आहे की लॉकडाउन वाढवायला लागणार नाही. रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा आहे. या सहा दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात बेड वाढवू. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. लॉकडाउनच्या काळात आम्ही ऑक्सिजनची औषधांची बेड्सची व्यवस्था करू,” असं केजरीवाल यांनी सांगितलं.
हा निर्णय अत्यंत दु:खानं घ्यायला लागत आहे. आपलं दिल्ली एक कुटुंब आहे. कुटुंबावर संकट आलं की सगळे मिळून त्याचा सामना करतात. आताही आपण सर्व मिळून याचा सामना करु,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.