महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक, २४ तासांतला मोठा आकडा समोर….
मुंबई : राज्यात जीवघेण्या करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. अशात आता महाराष्ट्रात २४ तासांत रुग्णांचा मोठा आकडा पुढे आला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत करोनाचे ३,२४९ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, मुंबईत ९७८ प्रकरणे आढळून आली. पण यामध्ये चांगली बातमी अशी की गुरुवारी शहरात आढळलेल्या १,२६५ प्रकरणांपेक्षा हा आकडा खूपच कमी आहे. काल गेल्या २४ तासांत मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा २२.६ टक्क्यांनी कमी झाला आहे. एकूण चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या, शुक्रवारी १२,४५२ चाचण्यांसह शहरात ७.८ टक्के होती.
राज्यात करोनामुळे चार जणांचा मृत्यू…
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात करोनाच्या संसर्गामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात ३,२४९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एका दिवसात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण अभ्यास केला तर ०१ जुलैपर्यंत २३,९९६ इतकी सक्रीय करोनाची प्रकरण होती. पण पावसामुळेही अनेक साथीच्या रोगांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं, महत्त्वाचं आहे.
देशात वाढत आहेत करोनाची प्रकरणं…
गेल्या काही दिवसांपासून देशात करोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे १७ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोव्हिडचे १७,०९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, १४,६८४ रुग्ण बरे झाले आहेत.
अहवालानुसार, सक्रिय प्रकरणे १,०९,५६८ आहेत. काल म्हणजेच १ जुलै रोजी १७,०७० नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. आजचा आकडा कालच्या तुलनेत ०.१ टक्के जास्त आहे. अहवालानुसार, देशातील पाच राज्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत.