“जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस”, काँग्रेस नेते राशीद अल्वींचं वादग्रस्त विधान, भाजपानं सोडलं टीकास्त्र!
नवी दिल्ली |
गुरुवारी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील हिंदुत्वाचं विश्लेषण वादाच सापडलं असताना आता काँग्रेसचे अजून एक नेते राशीद अल्वी यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेलं विधान वादात सापडलं आहे. “जय श्री रामची घोषणा देणारे सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत”, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला असून भाजपाकडून यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे. सलमान खुर्शीद आणि राशीद अल्वी यांच्या विधानांमुळे काँग्रेस पक्ष मात्र टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे.
भाजपा नेते अमित मालवीय यांनी राशीद अल्वी यांच्या या विधानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राशीद अल्वी जय श्री रामची घोषणा करणाऱ्यांविषयी मत मांडताना दिसत आहेत. “जे जय श्रीरामची घोषणा देतात, ते सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे”, असं राशीद अल्वी म्हणाले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याची खातरजमा झाली नसली, तरी अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल होऊ लागला आहे.
दरम्यान, राशिद अल्वी यांचा व्हिडीओ पोस्ट करताना अमित मालवीय यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राशिद अल्वी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना निशाचर (राक्षस) म्हणत आहेत. राम भक्तांच्या बद्दल काँग्रेसच्या विचारांमध्ये किती विष मिसळलं आहे”, असं या ट्वीटमध्ये मालवीय म्हणाले आहेत. राशिद अल्वींच्या या विधानावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही आक्षेप घेतला आहे. “रामावरून राजकारण केलं जाऊ नये. रामाच्या अनुयायांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. लोक याचं सडेतोड उत्तर देतील. रामभक्तांविषयी केलेली अशी विधानं चुकीची आहेत”, असं ते म्हणाले.