महापालिकेच्या विकासकामांबद्दल काँग्रेसने झळकावले बाजारपेठेत फलक
नगर |
शहरातील विकास कामांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे फलक काँग्रेसने शहरातील बाजारपेठेत लावले आहेत. बाजारपेठेत सुरू असलेल्या कामांची जनतेला माहिती कधी देणार, असा प्रश्न या फलकावर काँग्रेसने महापालिका आयुक्तांना जाहीररीत्या विचारला आहे. काही दिवसांपूर्वी शहर काँग्रेसने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी, रस्ते धूळ व खड्डेमुक्त करा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरीची मोहीम राबवली. त्यानंतर मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी शहरात तब्बल १३३ रस्त्यांची कामे झाल्याचा दावा करणारी यादी दिली. मात्र या यादीत बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांचा समावेश नाही तसेच अनेक रस्त्यांची नावे दोनदा दिली गेल्याने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
त्यानंतर आता काँग्रेसने बाजारपेठेत सुरू असलेल्या कामांची जनतेला माहिती कधी देणार असा प्रश्न करणारे फलक लावले आहेत. या संदर्भात बोलताना शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी सांगितले की, महापालिकेत जरी काँग्रेसची सत्ता नसली तरी मात्र जनतेच्या मनातील खरा विरोधी पक्ष म्हणून प्रश्नावर आवाज उठवणे काँग्रेसचे काम आहे. काँग्रेसने आवाज उठवल्यानंतर मनपाने चितळे रस्ता, तेलीखुंट, दाळ मंडई या रस्त्यावरील खड्डय़ांची तात्पुरती डागडुजी केली. मात्र मनपाने कामांची माहिती देणारे फलक लावणे आवश्यक आहे. असे फलक मनपाने न लावल्यामुळे काँग्रेसने कामाचे नाव, योजनेचे नाव, काम पूर्ण करण्याचा कालावधी, कामाची मंजूर रक्कम, ठेकेदार संस्थेचे नाव, ठेकेदार संस्था प्रतिनिधी व अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक देण्याचे फलकावर जाहीर केले आहे. परंतु मनपाने यासंदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्याने फलकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. असे फलक मनपा जाणीवपूर्वक लावत नाही. सुरू असलेल्या कामांची माहिती पारदर्शकपणे नगरकरांना मिळाली पाहिजे, या फलकावरील प्रश्नचिन्ह हटवून मनपाने माहिती देऊन रिकामी जागा भरावी असे आवाहनही काळे यांनी केले आहे.