गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कर संकलनात ४८ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अर्थव्यवस्था ठप्प झालेली असतानाही कर संकलनात मोठी भर पडली आहे. यावर्षी प्रत्यक्ष कर संकलनात तब्बल ४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, आगाऊ करभरणा ४१ टक्क्यांनी वाढला आहे. १६ तारखेपर्यंत १३.६३ लाख कोटी संकलन झाले आहे. गेल्यावर्षी याच तारखेला ९.१६ लाख कोटी संकलन झाले होते.
प्राप्तिकर, कंपनी कर, मालमत्ता कर, भेटवस्तू कर या करांचा प्रत्यक्ष करात समावेश असतो. एकूण जमा झालेल्या करापैकी वैयक्तिक प्राप्ती कराचा वाटा ४७ टक्के, कंपनी कराचा वाटा ५३ टक्के आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या यापूर्वीच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष करातून 11.30 लाख कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कर संकलन त्यापेक्षा कितीतरी जास्त झाले आहे.
दरम्यान, यंदा प्रत्यक्ष कर संकलन वाढीसोबतच आगाऊ कर भरणामध्येही मोठी वाढ झाली आहे. १५ मार्चपर्यंत ६.६२ लाख कोटींचा आगाऊ भरणा झाला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, या वर्षामध्ये कर विभागाने करदात्यांना १.८७ लाख कोटींचा परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशातील अर्थव्यवस्था डगमळीत झाली होती. गेल्या सहा महिन्यांपासून अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येत आहे. तरीही यंदाच्या एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर संकलन झाले आहे. तर, गेल्या काही महिन्यापासून जीएसटी कर संकलन दर महिन्याला एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे या आघाडीवर अर्थमंत्रालय पूर्णपणे यशस्वी झाले असल्याची परिस्थिती आहे.