नागपूर, नाशिकसह राज्यातील ११ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा
नाशिक | प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्याला हुडहुडी भरली असून, तापमानाचा पाराही चांगलाच घसरला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसणार असून, तसा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे आज आणि उद्या (३०, ३१ जानेवारी) औरंगाबाद, नाशिकसह ११ जिल्ह्यांत थंडीची लाट येणार आहे. हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या उत्तर भारतातील भागात हिमवृष्टी होत असल्याने देशातील विविध भागांमध्ये तापमानात घट झाली आहे.
महाराष्ट्रातही याचा परिणाम झाला असून, हवामान खात्यानं राज्यातील काही भागात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. आज (३० जानेवारी) राज्यातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
३१ जानेवारी रोजी ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार
उद्या (३१ जानेवारी) मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत थंडीची तीव्रता कायम राहणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाट असणार आहे.
मध्य आणि पश्चिम भारतालाही अलर्ट
हवामान विभागाकडून मध्य आणि पश्चिम भारतासाठीही अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील या भागांमध्ये तापमानात घट होण्याबरोबरच २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊसही पडू शकतो, असाही अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात ताशी १०-२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, त्यामुळे या भागातील तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. मध्य प्रदेशातील काही भागात थंडीची लाट कायम राहील. याशिवाय छत्तीसगड आणि विदर्भातही तापमानात घट नोंदवली जाईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.