राज्यात थंडीची लाट, धुळ्याचा पारा घसरून ५.५ अंशावर
मुंबई | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून हिवाळ्याचा मोसम खऱ्या अर्थाने जाणवू लागला असून आता तर संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट लाट आल्याचे चित्र जाणवत आहे. सध्या यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्य गारठला असल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन दिवसांत तर तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वांत कमी तापमानाची नोंद धुळ्यात ५.५ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.
राज्यातील जळगाव, रायगड, पालघर आणि मुंबईच्या तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. धुळ्यात तापमानाचा पारा ५.५ अंश सेल्सिअसवर गेला आहे. विदर्भातही थंडीची लाट पसरली आहे. अमरावतीत रात्रीच्या तापमानात घट झाली असून हिमालयातील बर्फवृष्टीचा परिणाम पहायाला मिळत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तर उबदार कपडे घालूनच नागरिक बाहेर पडत आहेत. तापमान १२ ते १३ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.परभणीतही पारा चांगलाच घसरला आहे. ९.५ अंश सेल्सिअसवर तापमान खाली उतरला आहे.यंदाच्या मोसमातील हे निच्चांकी तापमान आहे. आणखी पारा घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वर्ध्यातही नागरिकांना थंडीची हुडहुडी अनुभवता येत आहे.आज सोमवारी सकाळी जिल्ह्यात ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.तर नाशिक जिल्ह्यातील निफाडचे तापमान आज ८.६ वर स्थिरावले होते.तापमानात घट झाल्याने नागरिक उबदार कपडे घालूनच बाहेर पडतांना दिसते आहे.थंडी वाढल्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे देखील आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.