मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत कोकणात पूर परिस्थितीचा आढावा घेतला
मुंबई: कोकणात विशेषत रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागानं पुढले तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिला असून रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसंच प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली.
या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांना, पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे आणि काळजीपूर्वक काम करण्याच्या, तसंच कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.