बारावीच्या वेळापत्रकात बदल ‘अर्धमागधी’ विषयाची परीक्षा आता ८ मार्चला
पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत(Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) इयत्ता बारावीची परीक्षा मार्च महिन्यात होत आहे. याचे परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार ७ मार्च रोजी होणारी ‘अर्धमागधी’ (Jain Prakrit) विषयाची परीक्षा आता ८ मार्च या दिवशी होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (State Board of Secondary and Higher Secondary Education)इयत्ता बारावीची परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनाही देण्यात आले आहे. परंतु ७ मार्च रोजी दुपारी तीन ते सायंकाळी साडे सहा या कालावधीत ‘अर्धमागधी’ विषयाची परीक्षा आयोजित केली होती. या ‘अर्धमागधी’ विषयाच्या वेळापत्रकामध्ये अंशत: बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ‘अर्धमागधी’ विषयाची परीक्षा आता ८ मार्च रोजी दुपारी तीन ते सायंकाळी साडे सहा या वेळेत होणार आहे. या व्यतिरिक्त बारावीच्या लेखी आणि अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.