मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी लोकल २०-२५ मिनिटे उशिरा
मुंबई | प्रतिनिधी
शनिवारी ते सोमवार असा ३६ तासांचा जंबो मेगा ब्लॉक घेतल्यानंतर मध्य रेल्वे आज सलग तिसऱ्या दिवशी उशिराने धावत आहे. ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम झाल्यामुळे या नवीन मार्गावरून धीम्या उपनगरीय रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यामुळे मार्ग नवीन असल्याने गाड्यांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे उशिराने धावत आहे.
आज, बुधवार, म्हणजेच १२ जानेवारी २०२२ रोजी अप मार्गावरील मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन या २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत. ठाकुर्लीहून ५.३८ वाजता सुटलेली लोकल ट्रेन कळव्याला ६.५४ ला पोहचली. दिवा आणि कळव्यादरम्यान नवीन मार्गिकेवरुन गाडीचा वेग कमी ठेवा अशा रेल्वेच्या सूचना आहेत. त्याचा हा परिणाम असल्याची माहिती रेल्वेतील सुत्रांनी दिलीय.
जंबो ब्लॉक दरम्यान, रविवारी रेल्वे प्रशासनाने ठाणे खाडीवर बसविलेल्या दोन नव्या लोखंडी तुळईवरील रेल्वे रुळांवरून प्रायोगिक तत्त्वावर इंजिन चालविले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने सोमवारपासून खाडीवरील नव्या रेल्वे रुळावरून धिम्या उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू होणार आहे. ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.