सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे देशासाठी योगदान अतुलनीय : कविता कडू-भोंगाळे
- भोसरी येथे शोकसभेचे आयोजन
पिंपरी | प्रतिनिधी
भारताचे सीडीएस जनरल बीपीन रावत यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण देशाला जबरदस्त धक्का बसला आहे. बीपीन रावत यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे, अशा भावना गायत्री सखी मंच अध्यक्षा कविता कडू – भोंगाळे यांनी नुकत्याच व्यक्त केल्या. कारगिल युद्धापासून ते कांगो पर्यंत शांतता प्रस्थापित करण्यासाठी रावत यांनी केलेली बेधडक कामगिरी ही विशेष उल्लेखनीय आहे. असेही त्या म्हणाल्या.
गायत्री सखी मंच, भोसरी, व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभे दरम्यान माजी नगरसेवक वसंतनाना लोंढे, स्वातंत्र्य सैनिक श्री. जैद आदी उपस्थित होते. भोसरी संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम मंदिरात या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गायत्री सखी मंच अध्यक्षा कविता कडू – भोंगाळे म्हणाल्या, सीडीएस जनरल बीपीन रावत या महान योद्धयाच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणारी नाही. भारतमातेच्या या सुपुत्राला गायत्री सखी मंच मरणोत्तर श्रद्धांजली अर्पण करीत आहे.देशाच्या सुरक्षेस कायम केंद्रस्थानी ठेवून जनरल बीपीन रावत यांनी कार्य केले. संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी अत्यंत धाडसाने अतिशय महत्वाचे निर्णय घेतले व त्यांची अमलबजावणी देखील केली. अशा या शूर वीराचे अपघाती निधन नियतीने घडवून आणले ही बाब खूप दुख:दायक आहे.
यावेळी स्वर्गीय बिपिन रावत यांच्या प्रतिमेस मंचाच्या महिलांनी पुष्पांजली अर्पित करून श्रद्धांजली वाहिली. परिसरातील नागरिकांनी, बालकांनी, विद्यार्थ्यांनी रावत यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून शोक व्यक्त केला. व भारतमातेच्या या शूर वीरास अभिवादन केले.