३०० कोटींच्या लाचप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांची सीबीआय चौकशी
नवी दिल्ली | मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना ३०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारनेच या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याची शिफारस सीबीआयला केली आहे. सत्यपाल मलिक यांनीच गेल्या वर्षी राजस्थानातील एका जाहीर कार्यक्रमात त्यांना तशी लाच देऊ केल्याचा गौप्यस्फोट केला होता.
सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी कार्यरत असताना दोन फायलींना मंजुरी मिळवण्यासाठी ‘अंबानी’ आणि ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ संबंधित व्यक्तींनी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता. मात्र, ही ऑफर त्यांनी धुडकावून लावली होती. ज्या विभागाच्या या फायली होत्या. त्यांच्या सचिवांनी या फायलींमध्ये काहीतरी गडबड आहे पण त्या क्लिअर करण्यासाठी प्रत्येकी १५० कोटी मिळू शकतात, असे म्हटले होते. पण मलिक यांनी ही ऑफर धुडकावून लावली. मात्र आता एकंदर प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे.