देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल ; जल आक्रोश मोर्चानंतर खासदार जलील यांची मागणी
औरंगाबाद|भारतीय जनता पक्षाने औरंबादमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. भाजपच्या या आंदोलनावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे. भाजपच्या या मोर्चाचा पाण्याशी काहीही संबंध नसून ही सभा राजकीय सभा आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी तर पाण्याच्या प्रश्नाऐवजी औरंगजेब, संभाजी महाराज आणि नामांतराच्या मुद्यावर वक्तव्ये केली. याद्वारे त्यांनी औरंबादचे वातावरण बिघडवण्याचे काम केले. यामुळे पोलिसांनी बागडे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
भाजपच्या जल आक्रोश मोर्चानंतर खासदार जलील हे पत्रकारांशी बोलत होते. मोर्चासाठी परवानगी मागत असताना आम्ही केवळ पाण्यावर मोर्चा काढत असून पाणीप्रश्नावरच बोलणार आहोत, असे भाजपने पोलिसांना केलेल्या अर्जात म्हटले आहे. असे असताना तुम्हाला राजकीय सभा घ्यायची असेल तर घ्या, तुम्ही येथे राजकीय पोळी भाजून घेऊ नका. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. आता पोलिसांनी यावर कारवाई करावी. पाण्याच्या नावाखाली मोर्चा काढला आणि सभेत भलत्याच मुद्द्यांवर भाष्य केले याची दखल आता पोलिसांनी घेणे आवश्यक आहे, असेही जलील म्हणाले.
मोर्चात येण्यासाठी महिलांना प्रत्येकी अडीचशे रुपये आणि हंडे दिले
जल आक्रोश मोर्चावर टीकास्त्र सोडताना खासदार जलील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी महिलांना अडीचशे रुपये आणि हंडे देण्यात आले. एक महिला या मोर्चात हंडा घेऊन नाचत होती. तिच्या शेजारी हंडा घेऊन महिला उभी होती. त्या हंड्यांवर भाजप पक्षाची चिन्हे आणि नेत्यांचे फोटो आहेत. गोरगरीब पाणी देऊ शकत नाही, तर मग हंडे घ्या आणि मोर्चाला या, असे भाजपचे धोरण आहे. हंडा मिळतो म्हणून गोरगरीब महिला या मोर्चाला आल्या होत्या, अशी टीका खासदार जलील यांनी केली आहे.
समांतर जलवाहिनी योजनेला मी विरोध केला- जलील
भाजपच्या कार्यकाळात समांतर जलवाहिनी योजना आणली गेली. या योजनेला मी विरोध केला. यात पाण्याचा ठेका एका खाजगी कंपनीला दिला गेला होता आणि ही कंपनी भाजपची होती, असे सांगतानाच हे भाजप सांगण्याची हिंमत का दाखवत नाही, असा सवालही खासदार जलील यांनी केला. आम्ही या कंपनीकडून कमिशन घेत होतो हे सांगण्यीची हिंमत भाजपने दाखवली पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.