CAA कायदा मुस्लिमांविरोधात नाही- रजनीकांत…
ज्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्या कायद्याचा मुस्लिम समाजाला कोणताही धोका नसल्याचे सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी म्हटले आहे. त्याचवेळी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सूची (NPR) अद्ययावत करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयही अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकारच्या काळातही हे करण्यात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
चेन्नईमध्ये पत्रकारांशी बोलताना रजनीकांत म्हणाले, सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे मुस्लिमांना कोणताही धोका नाही. जर या कायद्यामुळे मुस्लिमांना कोणताही त्रास झाला तर सर्वात आधी मी त्यांच्यासाठी आवाज उठवेन. भारतीयांना या कायद्यामुळे कोणताही त्रास होणार नसल्याचे केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सूची अद्ययावत करणेही अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळातही एनपीआर अद्ययावत करण्यात आला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
देशाच्या फाळणीनंतर ज्या मुस्लिमांनी भारतात राहण्यालाच पसंती दिली होती. त्यांना देश सोडून कसे काय पाठवले जाईल, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. काही राजकीय पक्षांकडून वैयक्तिक स्वार्थासाठी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात लोकांच्या भावना भडकाविण्याचे काम केले जात आहे, असे सांगून काही धार्मिक नेतेही या प्रकरणात आगीत तेल ओतण्याचे काम करताहेत, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.