बैलगाडा शर्यतीचा लढा : सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!
- बळीराजा अन् शर्यतप्रेमींच्या मागणीला न्याय मिळेल
- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली | टीम ऑनलाईन
महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर आज सुप्रिम कोर्टात सुमारे एक तास युक्तीवाद झाला. परंतु, वेळेच्या मर्यादेनुसार आज सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. पण उद्या सकाळी सुनावणी होऊन उद्याच निकाल येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये बैलगाडा शर्यतीचा अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी बाजू मांडत आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, अखिल बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. तसेच, बैलगाडा शर्यतप्रेमींकडून हा निकाल शेतकऱ्यांच्या बाजुने लागावा म्हणून प्रार्थना करीत आहेत.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, सुप्रिम कोर्टात झालेला युक्तीवाद हा आमच्या अर्थात शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या बाजुने सकारात्मक झाला. राज्य सरकारच्या वकीलांनी सकारात्मक बाजू मांडली. खरेतर वकीलांचे कौतूक करायला पाहिजे. कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनातील भावना आज त्यांनी कोर्टात मांडल्या. परंतु वेळेच्या मर्यादेनुसार आज सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. पण उद्या सकाळी सुनावणी होऊन उद्याच निकाल येईल अशी अपेक्षा आहे.
बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, कोर्टात आज चांगला युक्तीवाद झाला. सुमारे एक तास युक्तीवाद झाला. त्यामध्ये राज्य सरकारची बाजू मांडत असताना वकीलांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या ज्या बॉर्डर आहेत, त्याच्या पलीकडे अर्थात इतर राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतीला परवानगी का देण्यात येवू नये. शिवाय, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला सकारात्मक निर्णय सुप्रिम कोर्टाने मान्य करावा, आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतीला परवागनी देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.