जेडीएस कोणाबरोबर जाणार याविषयी औत्स्युक्य

- जेडीएस बरोबर जाण्याची वेळ येणार नाही- कॉंग्रेस
भाजपलाही वाटतोय स्वबळावर सत्ता स्थापनेचा विश्वास
बंगळुर – विविध वृत्तवाहिन्यांनी काल कर्नाटकातील विधानसभेचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे जे निकाल घोषित केले आहेत त्यानुसार कर्नाटकात त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात येणार असून सत्तास्थापनेची सूत्रे जनता दल सेक्युलरकडे जाण्याची शक्यता सूचित केली असली तरी भाजप किंवा कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी स्वबळावरच आम्हाला सत्ता मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान जेडीएसच्या प्रवक्ते दानिश अली यांनी मात्र त्रिशंकु विधानसभा अस्त्विात आली तर आम्ही भाजपबरोबर जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही तर त्यांना आमची गरज भासेल पण त्यासाठी त्यांनीच प्रयत्न केली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पण कॉंग्रेस नेत्यांनी मात्र आम्हाला जेडीएसची गरज भासेल असे वाटत नाही असे म्हटले आहे.
कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी एक्झिट पोलचे निकाल फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की हे एक्झिट पोल आहेत एक्झॅट पोल नव्हे. त्यामुळे आम्हाला त्यावर अवलंबून राहता येणार नाही. आम्ही स्वबळावरच राज्यात सरकार स्थापन करू आम्हाला जेडीएस बरोबर जाण्याची वेळ येणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. तिकडे भाजपचे नेते बीएस येडियुरप्पा यांनी आज पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावा केला असून आम्हाला तेथे 125 ते 130 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. काल सुमारे आठ वाहिन्यांनी एक्झिट पोल घेतले. त्यात तीन संस्थांनी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा दावा केला आहे तर पाच संस्थांनी भाजप हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरेल असे म्हटले आहे. या सर्व चाचण्यांमध्ये जेडीएसला 35 ते 40 जागा मिळतील असा अदांज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे या पक्षाला त्रिशंकु अवस्थेत अधिक महत्व येणार आहे. आज तरी या पक्षाने आम्ही भाजपबरोबर जाणार नाही अशी भूमिका मांडली असली तरी या आधीही या पक्षाने भाजपबरोबर युती केली असल्याने ते नेमकी कोणीत भूमिका घेणार यावर कर्नाटकातील सत्तास्थापनेचे गणित अवलंबून असणार आहे. परवा पंधरा मे रोजी त्या राज्यात मतमोजणी होणार आहे.





