ताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

रेल्वेच्या तिकिटांचाही ‘काळा बाजार’,मध्य-पश्चिम रेल्वेची तब्बल ३.३८ कोटींची तिकिटे जप्त

प्रतिनिधी |  मुंबई

सुटीच्या दिवसांत रेल्वे तिकिटांना प्रचंड मागणी असते. ही मागणी लक्षात घेत दलालाकडून तिकिटांचा काळाबाजार सुरू होतो. रेल्वे सुरक्षा दलाने सायबर सेल पथकाच्या मदतीने काळाबाजार करणाऱ्या दलालांना बेड्या ठोकत तब्बल ३.३८ कोटींची तिकिटे जप्त केली आहेत.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षण तिकिटांच्या काळाबाजार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. सायबर सेलकडून मिळालेल्या डेटा आणि इतर इनपुटच्या आधारे मध्य रेल्वेचे आरपीएफ खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापे टाकतात.

एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत २६७ प्रकरणे नोंदवण्यात आली असून आतापर्यंत ३२८ जणांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या छाप्यांमधून १.२० कोटींची तिकिटे जप्त करण्यात आली. यात ई-तिकीट आणि खिडक्यांवरील तिकिटे या दोन्हींचा समावेश आहे. मुंबई विभागात दलालीचे १२१ गुन्हे दाखल झाले असून, आतापर्यंत १५९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७४.०६ लाख रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली.

पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने ६८४ प्रकरणात ८२४ दलालांना बेड्या ठोकल्या आहेत. या दलालांकडून २.१८ कोटीं रुपयांची एकूण १९,२६८ तिकिटे जप्त केली आहेत.

आरपीएफ ने ‘प्रबल’ (पीआरएबीएएल) आणि यासारख्या अन्य सॉफ्टवेअरने सुसज्ज असलेले आयटी सेल आणि कौशल्य विकास केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रातून तिकीट काळाबाजार प्रकरणाचा तपास, सायबरस्पेसवर पाळत ठेवणे, सीसीटीव्ही मॉनिटरिंग असे काम केले जाते. यांच्या माहितीनुसार ‘आरपीएफ’ला छापे टाकण्यास मदत होते.

रेल्वेचे आवाहन

दलालांकडून तिकिटे खरेदी करू नये. कायदेशीर कारवाईमुळे तिकीट ब्लॉक केल्यास त्यांचे पैसेही बुडतील. केवळ अधिकृत संकेतस्थळ आणि रेल्वे तिकीट खिडक्यांवरूनच तिकिटांची खरेदी करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button