भाजपचा अजेंडा हा एससी, एसटीचेही आरक्षण संपवायचा -नवाब मलिक
मुंबई | प्रतिनिधी
केंद्र सरकार राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी म्हटलं आहे की, भाजपचा अजेंडा हा एससी, एसटीचेही आरक्षण संपवायचे आहे. आरक्षणविना निवडणुका घेणार नसल्याचे राज्याने ठरवलं आहे. आरक्षण न दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ओबीसी आरक्षणाचा पेच कोर्टाच्या आदेशानुसार झाला आहे. याला जबाबदार केंद्र सरकार आहे. राजकीय आरक्षण संपलं पाहिजे अशी भूमिका त्यांची आहे. मंडल आयोगाच्या माध्यमातून ज्यावेळी ओबीसी आरक्षण येणार होते त्यावेळी ABVPने त्याला विरोध केला होता आता देखील भाजपने छुप्या मार्गाने कोर्टात विरोधातील याचिका टाकली होती. 27 टक्के आरक्षण गेलं त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो यासोबतच आम्ही आयोगाला 400 कोटी रुपये देत आहोत. हिंदवी आणि हिंदू असा शब्दांचा खेळ भाजपने खेळू नये. महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केलं नाही, असं मलिक म्हणाले.
बैलगाडी शर्यतीवर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, देशभरात शेतकऱ्यांच्या माध्यमातून बैलगाडी शर्यत आयोजित केली जाते. जलीकट्टू येथे कोर्टाच्या माध्यमातून शर्यत सुरू होते. आम्ही देखील बैलगाडा शर्यत सुरू करा अशी मागणी केली. कोर्टात आम्ही मागणी केली होती ही शर्यत सुरू व्हावी. आम्ही कोर्टात तशी बाजू मांडली आणि त्यात यश आले, असं मलिक म्हणाले.
जैतापूर प्रकल्पसंदर्भात बोलताना ते त्यांनी म्हटलं की, जैतापूर प्रकल्प बळजबरीने राबवू नका. स्थानिकांना विश्वासात घेणं पहिल्यांदा गरजेचे. एकतर्फी निर्णय घेवू नका. आम्ही केंद्राला आमची भूमिका कळवू, असं ते म्हणाले. निधिवाटपावर बोलताना ते म्हणाले की, पक्षाला निधी दिला जात नाही. विकासकामाला निधी दिला जातो, असं मलिक म्हणाले.