Birthday Special: रतन टाटांबद्दल ‘या’ पाच गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
व्यवसाय करताना समाजहिताचा प्राधान्याने विचार करणाऱ्या उद्योगसमूहांमध्ये टाटा उद्योगसमूहाचे स्थान पहिले असेल. टाटा सन्सचा आज भारतासह जगभरात जो विस्तार झालाय त्यामध्ये रतन नवल टाटा यांचे महत्वाचे योगदान आहे. १९९१ साली रतन टाटा यांनी टाटा सन्सची धुरा सांभाळली तेव्हापासून या उद्योगसमूहाने मागे वळून पाहिलेले नाही. उद्योगविस्ताराबरोबर नैतिकता जपण्याला टाटा समूह पहिले प्राधान्य देतो त्यामुळे रतन टाटा यांचा फक्त उद्योगक्षेत्रातच नव्हे तर सर्वसामान्यही प्रचंड आदर करतात.
रतन टाटा यांच्याबद्दल समाजात प्रचंड आकर्षण असून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी जणांना काही गोष्टी माहिती असतील. १९६१ साली त्यांना आयबीएममध्ये नोकरीची ऑफर आली होती. पण त्यांनी ही ऑफर नाकारली आणि कौटुंबिक व्यवसायामध्ये स्वत:ला झोकून दिले आणि टाटा सन्सला नव्या उंचीवर घेऊन गेले.
भारताचे यशस्वी उद्योगपती असलेल्या रतन टाटा यांच्याबद्दल आपण आज अशाच पाच गोष्टी जाणून घेणार आहोत.
– रतन टाटा आता टाटा सन्सच्या दैनंदिन काराभारापासून दूर असले तरी त्यांनी अनेक स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया ते ई-कॉमर्स अशा वेगवेगळया क्षेत्रात त्यांनी गुंतवणूक केली आहे. एखादेच असे क्षेत्र असेल ज्यात टाटा यांनी गुंतवणूक केली नसेल. ३० पेक्षा जास्त स्टार्ट अप कंपन्यांमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. उदयोन्मुख प्रतिभेवर विश्वास ठेवण्याची टाटांची जी परंपरा आहे त्यानुसारच ही गुंतवणूक करण्यात आली आहे.
– रतन टाटा अविवाहित आहेत पण चारवेळा त्यांच्या मनात लग्नाचा विचार आला होता. २०११ साली सीएनएन इंटरनॅशनला या वृत्तवाहिनीला टॉक एशिया कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वत: ही कबुली दिली होती. चारवेळा मी लग्न करण्याच्या निर्णयाप्रत आलो होतो. पण प्रत्येकवेळी मी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे मनात असलेल्या भितीपोटी माघार घेतली.
– रतन टाटा यांचा जन्म श्रीमंत, संपन्न पारसी कुटुंबात झाला असला तरी त्यांचे बालपण मात्र त्रासदायक होते. रतन टाटा फक्त सात वर्षांचे असताना त्यांचे वडिल नवल टाटा आणि आई सून्नी टाटा विभक्त झाले. त्यानंतर रतन टाटा यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला.
– व्यापार-उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल रतन टाटा यांनी भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २००० साली रतन टाटा यांना पद्म भूषण या तिसऱ्या क्रमांकाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ साली त्यांना पद्म विभूषण पुरस्कार मिळाला.