मोठी बातमी! नारायण राणेंचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
रत्नागिरी |
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले आहेत. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, सकाळी नाशिकमध्ये भाजपाच्या जिल्हा कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करुन तोडफोड केली. त्यानंतरही अनेक ठिकाणी अशाप्रकारची आंदोलन होत असल्याचं दिसत आहे. मात्र असं असतानाच आता विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यालयांवर हल्ले करणाऱ्या शिवसैनिकांना तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना इशारा दिलाय. मुंबईमध्ये फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये राणेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. राणेंच्या वक्तव्याचं आम्ही पक्ष म्हणून समर्थन करणार नाही पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करतंय ते बघता आम्ही राणेंच्या मागे ठाम उभे आहोत असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच राज्यभरामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनांसंदर्भात बोलताना फडणवीस यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड सहन केली जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. “भाजपाच्या कार्यालयांवर हल्ला केला तर खबरदार, ते सहन केलं जाणार नाही,” अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी आंदोलकांना इशारा दिलाय. “आम्ही हिंसा करत नाही, आम्ही राडेबाज नाही, उद्या आमच्या कार्यालय हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर दोन्ही विरोधी पक्षाचे नेते त्या आयुक्तालयांच्या कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करु,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.