मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; पंचायत निवडणुका रद्द
भोपाळ | प्रतिनिधी
मध्य प्रदेशातून एक मोठा निर्णय समोर आला आहे. राज्यातील पंचायत निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील शिवराज सिंह सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज रविवारी मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीमध्ये पंचायत निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास पंचायत निवडणुकीसाठीचा अध्यादेश काढला जाणार आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जातंय.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा या निर्णयाबाबत बोलताना म्हणाले की, राज्यामध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. अशा परिस्थितीत पंचायत निवडणुका घेणं योग्य ठरणार नाही. यापूर्वीही निवडणुका जीवापेक्षा जास्त महत्त्वाच्या नसतात त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजे असल्याचं विधान त्यांनी केलं होतं.
राज्यातील पंचायत निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचायत निवडणुका तीन टप्प्यात प्रस्तावित होत्या. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, पहिल्या टप्प्यासाठी पुढील वर्षी 6 जानेवारीला मतदान होणार होतं. त्यानंतर 28 जानेवारी आणि 16 फेब्रुवारीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार होते. राज्यातील 22 हजार 695 ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकीत सुमारे 71 हजार 389 मतदान केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.