राजापूरमध्ये लवकरच होणार रिफायनरीचे भूमिपूजन!; शिष्टमंडळ दिल्लीला जाणार- प्रमोद जठार
राजापूर, रत्नागिरी |
कोकणात रिफायनरी प्रकल्पावरून वातावारण ( Rajapur Refinery Project ) तापू लागलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा गेल्या आठवड्यात तीन दिवसांचा कोकण दौरा झाला. या दौऱ्यात रिफायनरीचा मुद्दा तापला होता. दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीसाठी रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बाससू धोपेश्वरच्या जमिनीचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. त्याचवेळी स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. आता रिफायनरी समर्थक आणि विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यात रिफायनरी समर्थक आणि विरोधकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण आता राजापूरमधील बारसू धोपेश्वरमध्ये प्रकल्पाचे लवकर भूमिपूजन होणार आहे, असा मोठा दावा भाजपचे प्रवक्ते प्रमोद जठार ( bjp leader pramod jathar ) यांनी केला आहे.
कोकणात राजापूर येथे होऊ घातलेल्या बारसू धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन होणार, असं वक्तव्य प्रमोद जठार यांनी राजापूर येथे केलं. यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीत केंद्र सरकारच्या भेटीलाही ( ratnagiri oil refinery ) जाणार आहे. कोकणातील तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. रिफायनरीमुळे येणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याने रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे आहे. यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री यांनी दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेचं स्वागत करतो, असं त्यांनी सांगितलं. लवकरच राजापुरातील एक शिष्टमंडळ केंद्र सरकारच्या भेटीला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. दरम्यान, नाणार प्रकल्पाची प्रस्तावित रिफायनरीची अधिसूचना यापूर्वीच रद्द झाली आहे. आता हा रिफायनरी प्रकल्प राजापूरच्या बाससू धोपेश्वर येथे व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, इथेही स्थानिकांचा विरोध आहे. गेल्या आठवड्यात चार दिवसांपूर्वी राजापूर तहसीलदार कार्यालयावर प्रकल्पाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता.