भुजबळच पालकमंत्री राहणार; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
नाशिक – पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद हा स्थानिक विषय आहे. त्यावर मार्ग निघेल. गरज पडल्यास मुख्यमंत्री तोडगा काढतील, असे सांगून नाशिकच्या पालक मंत्रीपदी भुजबळच कायम राहतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. राष्ट्रवादीच्या ‘परिवार संवाद यात्रे’साठी ते येवला येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भाजप मनसेसोबत युती करण्यासाठी लाजत असल्याची बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते नाशिकचे पालकमंत्री आहेत. पक्ष नेहमीच त्यांच्या सोबत आहे आणि राहिल. सुभाष कांदे आणि त्यांच्यातील वादात आम्हाला हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नाही. हा वाद महाविकास आघाडी अंतर्गत विषय आहे. तो चर्चेने सोडवता येईल. मुख्यमंत्री यावर मार्ग काढतील. यात अंडरवर्ल्ड डॉनच्या फोनची चर्चा झाली. पण मी भुजबळांना अनेक वर्षांपासून ओळखतो. ते अशा मार्गाचा अवलंब करणार नाहीत. हा विषय अजिबात अडचणीचा किंवा गंभीर नाही. ते दोघेही एकत्र बसून त्यावर मार्ग काढतील, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.